Sunday, November 27, 2022

महात्मा फुले |Mahatma Phule

 


    जोतीराव गोविंदराव फुले 

जन्म दिनांक-११ एप्रिल १८२७

 मृत्यू दिनांक- २८ नोव्हेंबर १८९०

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

असे थोर विचार मांडणारे व रायगडावरील छ. शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे महान समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते.

महात्मा जोतिबा फुले  यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिबांचे आजोबा शेरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर जोतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर जोतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते.



महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या The Right Of Man, Justice and Humanity, Common SenseThe Age of Reason या पुस्तकाचा प्रभाव होता.


जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.


महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण:

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये वयाच्या १४ व्य वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत.

महात्मा जोतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य:

१) अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्रा. मिस फरारकडून प्रेरणा घेऊन ३ ऑगस्ट १९४८ रोजी जोतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत ८ मुली उपस्थित होत्या. महात्मा जोतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्यध्यापिका बनविले. शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून जोतिबांना त्यांच्या पत्नींसोबत गृहत्याग करावा लागला. यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात मुक्काम केला.

२) १८५० – ३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरु केली. १८५२ साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली.

३) १९ मे १८५२ रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली.

४) शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे (सध्याचे डेक्कन कॉलेज) प्रा. मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून जोतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

५) महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर१८५३ मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी ‘मंडळी’ नामक संस्था स्थापन केली. तर १९५५ मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली.

६) १८८२ साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर फुलेंनी साक्ष देऊन १२ वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.


महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा:

१) १८९५ साली फुलेंनी वयाच्या२८ व्या वर्षी पुण्यात ‘तृतीय रत्न’ हे पहिले नाटक लिहिले. हे जोतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते.

२) २८ जानेवारी १८६३ रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे १८७३ मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला.

३) १८७७ साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच ‘व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची’ स्थापना केली.

४) विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.

५) ८ मार्च १८६४ रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला.


महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य:

महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला.‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

महात्मा फुले यांचा मृत्यू दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.


No comments:

Post a Comment